____बेत आखला आणि तो पूर्णत्वास गेला की मन प्रसन्न होते. आपल्या लेखी असणाऱ्या सुखाची अनुभूती काही काळापुरता आपल्या सोबत असते, यथावकाश त्या सुखाचे महत्व आपसूकच कमी होत जाते. आणि आपण दुसरे सुख शोधण्यात व्यस्त होतो हि शृंखला निरंतर चालू असते. वाटांचा प्रवास करतांना आपण एकाच वाटेवर एकाच ठिकाणी जसे स्थित राहत नाही ती जागा बदलत जातो तसा मनुष्य स्वभाव हि आहे. त्याचप्रमाणे नदीच्या पात्रात आपण स्पर्श केलेले पाणी त्या ठिकाणी आपले बनून राहत नाही आणि पुन्हा तेच पाणी आपल्याला कधीच मिळत नाही पण वाहत राहणे हा नदीचा स्वभाव आहे. एकूणच त्यातून मिळणाऱ्या प्रासंगिक, नैसर्गिक आठवणींचा ठेवा आपण नित जपतो आणि जगतोही.
____तर दक्षिणेस वळलेल्या माना तिथेच खिळल्या. दूरवर हिमशिखराच्या शृंखला दृष्टीस पडत होत्या. त्यात मुकुटमणी शोभावा तसा सूर्य तेजात न्हाहून निघालेला माथा अगदी बावनकशी सोन्यात मडलेला, प्रत्यक्ष सोन्याचेही अलंकारिक सौंदर्य फिके पडावे असा देखणा दिसत होता. यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी होती ती म्हणजे... सूर्य प्रत्यक्ष दिसत नसला तरी त्या हिमशिखरांनी इतकी उंची गाठली होती की सूर्य तेजाचे कोवळे सोनेरी ऊन, त्यास न्हाऊ घालत होते. आणि त्या सोनेरी किरणांचा अभिषेक होत असतांना, त्याचे विविध पैलू आमच्या नजरेला सुखावत होते. त्याच्या सर्वांगातून सोनेरी झळाळी निथळत होती.____ पलीकडील दर्यांचे सुरुंग पेरत... उंचच उंच हिमशिखरे... सोनेरी झळालीने सजलेल्या... ढगांच्या राजसभेत... डौलाने विराजित होती... आकाशातील नुकताच जागा झालेला... अथांग नीलिमा लोलुपतेन त्या दृश्यावर वाकला होता. त्या सोनेरी चैतन्याने सारं आसमंत मोहरले होते. काही क्षणातच ते सौंदर्य फिके पडू लागले. पूर्वेस डोंगर वस्तीतून सूर्य नारायण उदयास येऊ लागले. सूर्यमालेतील सारेच ज्याच्या सभोवती उत्कट प्रेमभावणेने मोहित होऊन अनादी अनंत काळापासून अविरत चकरा घालत आहेत. ऐसा तो भास्कर या धरित्रीच्या प्रेमात पडावा, आणि आपले तेज म्यान करून डोंगर कुशीत निद्रिस्त व्हावा. रात्रीच्या शीतल विश्रांतीनंतर, नुकताच जसा उदयोन्मुख व्हावा.
_____असे ते सोज्वळ रूप आमच्या दृष्टीस पडू लागले. रात्रीस ताबा घेतलेल्या, तारे-चांदण्यांनी त्या तेजकुंभाचे स्वागत करून आपली जागा सोडली.संदिग्धतेच्या सांत्वनास येण्यासाठी रात्रीच्या प्रतीक्षेत ते आकाशात विलीन झाले. चंद्रानेही झोपेचं सोंग घेतलं आणि तो अदृश्य झाला. गारवा मात्र आम्हास अजून
धरून होता. इतकं प्रेम कसं कुणी कुणावर करू शकतं..!! त्याच्या स्पर्शाने लटलटणारे देह मात्र त्यांस न जुमानता, सुर्योदयाचे ते रमणीय दृष्य पाहण्यात मशगुल होते. सूर्य क्षण प्रतिक्षण वरच्या दिशेने सरकत होता.
____गाडी खालच्या दिशेने भरभर उतरली. ती थेट बतासिया लूप गार्डनच्या गेटबाहेर थांबली. आम्ही गेटमधून आत शिरलो. तोच या गार्डनच्या अगदी मधोमध स्वातंत्र सेनानी स्मारक दृष्टीस पडले. आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून देशातील वेगवेगळ्या ठिकाणी जी आंदोलनं झाली. त्यात येथील स्थानिक धारातीर्थी पडलेल्या गोरखा सैनिकांच्या आठवणीत हे स्मारक उभारले आहे. १९९५ साली या स्मरकाचं उदघाटन केलं गेलं. या स्मारकाची उंची जवळपास ३५ते ३६ फूट आहे. त्यावर शाहिद झालेल्या सैनिकांची नावे आणि तारखा कोरलेल्या आहेत. त्या स्मारकाच्या बाजूलाच नऊ फूट उंचीची गोरखा स्वतंत्र सैनिकाची पितळेची अप्रतिम प्रतिमा उभारलेली आहे. त्या सोबतच शेजारी आपला राष्ट्रध्वज मनाने फडकत होता. तिचे आम्ही सारेच नतमस्तक झालो. आज २६ जानेवारीच्या दिवशी आम्हास ज्यांनी ज्यांनी या देशासाठी आपले रुधिर सांडले त्या प्रितर्थ्य साकारलेल्या स्मारकाच्या दालनात उभे राहून त्या पवित्र स्मृतींना मानवंदना देण्याचा योग आला. धन्य जाहलो.
____अगदी त्याच्या मागेच आकाशाला गवसणी घालणारा बर्फाच्छादित माथा, ज्याचा टायगर हिल वरून सोनेरी किरणांनी अभिषेक होताना पहिला होता. आता त्यावर दुग्धाभिषेक होतांना दिसत होता. आमचं आहोभाग्य की आज वातावरण स्वच्छ असल्या कारणे आम्हास एव्हरेस्ट आणि कंचनजंघा ही दोन्हीही शिखरं येथून दिसत होती. त्यात अगदी स्वच्छ आणि नेटके दिसणारे शिखर म्हणजे कंचनजंघा. समुद्रसपाटीपासून जवळपास २८००० फूट उंचीवर स्थित, हिमपर्वत श्रुखलेतील दार्जिलिंग पासून ७४ किलोमीटर अंतरावरील, सिक्कीम आणि नेपाळच्या सीमेवरील नेपाळच्या हद्दीती हे शिखर स्थित आहे. ते मनोरम दृश्य आमच्या नजरेस सुखावत होते.
___या गार्डनचं आणखीन एक आकर्षण म्हणजे इथे दार्जिलिंग मधील पर्यटकांचं आकर्षण असलेली अनोखि टॉय ट्रेन आपल्याला इथे डोंगरघाटातून प्रवास करण्यासाठी सज्ज असताना आपणास पहावयास मिळते. १९२१ मध्ये साडे सात हजार फूट उंचीवर जवळपास ७० किमी लांबीचा हा डोंगर घाटातून निर्माण केलेला हा रेल्वेमार्ग म्हणजे इंजिनिअरिंगचा एक अद्भुत नमुना आहे. पण त्या ७० किमी लांबीतील सर्वात मोहक असे स्थळ असेल तर ते बतासिया लूप गार्डन म्हणायला हरकत नाही. जिथे हा रेल्वेमार्ग अगदी आठ आकाराच्या कोशात फिरून वरच्या दिशेने मार्गक्रमण करत असतो. इथेच एक छोटचा बाजारही भरत असतो. ज्यात आपण स्थानिक कलाकुसरीचे सामानही खरेदी करू शकतो.नितेश पाटील (९६३७१३८०३१)



