Sunday, March 19, 2017

उदास पाचोळा


उदास पडे तो पाचोळा
वारा संगे घेऊन जाई
आले खोडास अंकुर नवे
काय गुन्हा तो गळून जाई
___सिक्कीम मध्ये दोन प्रोजेक्ट चालू असल्यामुळे मानपुरहुन नामथांग आवागमन करावी लागते. सिक्कीम मध्ये प्रामुख्याने चार जिल्हे आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण सिक्कीम. एक प्रोजेक्ट पश्चिम सिक्कीम मधे तर दुसरा पूर्व सिक्कीम मधे म्हणून प्रवासाची दगदग होते. त्यातच सिक्कीमचा प्रवास म्हणजे शर्थीचं काम. डोंगर, दऱ्या, नद्या, जंगलांनी, डोंगरउतारावर गजबजलेल्या खेड्या, शहरांनी गजबजलेला प्रदेश. सपाट प्रदेशाचा लवेशही नाही. रस्तेही इथे जरा दचकूनच असतात. कधी दरड कोसळेल आणि त्यांच्या जीव गुदमरेल हे त्यांनाही ठाऊक नसतं. त्यात त्यांच्यावर आवागमन करणारी वाहने. वर शे सव्वाशे फूट उंचीच्या झाडांचा डोलारा मिरवत असणारे उंच डोंगर, आणि खाली डोंगरघळीतून फेसाळत वाहणारी तिस्ता.
____ मानपुर ते नामथांग ५३ किलोमीटरचा प्रवास. आम्ही मुक्कामी मानपुर असलो तरी नामथांगला जाण्यासाठी मात्र पश्चिम बंगाल मध्ये प्रवेश करणे चुकत नाही. कारण हा रस्ता त्यातल्या त्यात सोयीचा. सकाळी कामावर जाण्याची लगबग चालू होते. सात वाजता मानपुर सोडतो. काल वातावरणात गारवा होताच, पण आकाश मात्र अजून ढगांनी वेढलं होतं. काल परवा पाऊस होऊन गेलाच होता. आज काय ती मोकळीक होती. सिक्कीम सोडून मेल्लीचा तिस्ते वरील पंडित जवाहरलाल नेहरू ब्रिज क्रॉस करून पश्चिम बंगाल मधे प्रवेश केला. आणि रेंगपो गँगटोक कडे जाणारी वाट धरली. वाटेत उजव्या हातावर उंच उंच झाडांची गर्द दाटी आणि डाव्या हातावर खाली तिस्तेची खळखळ चालू होती.
____वसंताचं आता काही दिवसातच आगमन होणार म्हणूनच पानगळतीमुळे रस्त्यावर पडलेला उदास पाचोळा वाऱ्याने सैरवैर होत होता. वारा त्याच्या मनाविरुद्ध त्याला वाहून नेत होता.  काही दिवसांपूर्वीच ज्यांनी त्या गगनचुंबी वृक्षांना सौंदर्यवान बनवलं, आज त्याच वृक्षांकडे त्यास राहण्यास जागा नव्हती, म्हणा किव्हा त्यांनी त्याचा त्याग केला होता. कारण परिस्तिथीशी सामना करता येतो, संघर्ष करता येतो पण परिस्तिथी बदलणं तदक्षणी आपल्या हातात नसते. त्यासाठी सुरवातीपासूनच आपला पाया मजबूत असायला हवा. शेवटी सुकली पाने.. ती गळनारच तो निसर्ग नियम आहे, पण पिकलं पान गळतं किव्हा त्याग करतं हे निसर्ग नियमाला अनुसरून नाही. याची जाण त्या वृक्षांस, तत्पूर्वी तो वृक्ष बहारदार बनवणार्यास असायला हवी.... असो... पाचोळा कितीही त्यागी असला तरी त्या वृक्षांस मात्र त्याचं काहीएक घेणंदेण नव्हतं. पण  पाचोळा मात्र मनात एक आस घेऊन अजूनही त्या वृक्षाच्या पायाशी रेंगाळत होता.सुकल्या पानांनी आधीच दडी मारली होती, पण पिकली पाने मात्र त्या गर्द झाडांच्या दाटीत डोंगरउतारावर पांगुन आसुसलेली विखुरली होती. निसर्गसोबतच माणूसही त्याची पुनरावृत्ती करतोय. फरक एवढाच कि पाचोळा गळतो आणि माणूस गाळतो.

___त्या उदास पाचोळ्याचे सल उरात घेऊन साईटवर पोहचलो. दिवस सरला. आणि रोजची सांज आज वेळेआधीच आपले बस्तान मांडू लागली. दिवसभर सूर्य जागा असूनही त्याला काही काळसावळ्या मेघांनी दृष्टीस पडू दिलं नाही. इथलं वातावरण क्षणात बदलतं. जश्या समुद्राच्या लाटा प्रतिक्षण बदलतात. आणि तशीच माणसंही काही.... बरं... सांज लवकर आली खरी पण गारवा कवटाळूनच. त्या उदास पाचोळ्याचा दाह शामविण्याचा तिचा प्रयत्न असावा. पण त्यातूनही आपण या सृष्टीचं काही देणं लागतो हि जाणीव पडत्या वेळेसही त्यांना होती.आणि म्हणूनच त्या निर्दयी वृक्ष मनोऱ्यातून, पायथ्याशी घुटमळणाऱ्या  पाचोळ्याचे, अंतरीच्या यातनांचे बाष्परूप  डोंगरमाथ्यावर सौंदर्याची पखरण करत होते. ज्यांच्या मनात फक्त देणं आणि देणं हीच भावना असते, ते घेण्याचा विचार कधीच करत नाहीत. जसे आईवडील आपल्या मुलांप्रति निस्वार्थी आणि प्रामाणिक असतात. आणि त्यांचीच काही मुलं कर्मदरिद्री, अकृतज्ञ असतात हि शोकांतिका... 
____त्या सौंदर्याचा मेघांनाही लळा लागला.त्या मृदू वाटणाऱ्या सौंदर्यास त्यांनी नभात गळाभेट घेण्यास सुरवात केली. आणि एकवटलेले दुःख अनंत नभातून क्षुष्म धरेवर अश्रू ढाळू लागले. या मायानगरीत गुंतलेल्या जीवाला त्या अश्रूंचा सुगावा लागणं कठीण. आम्ही मात्र साईटवरून काढता पाय घेतला. अंधार बळावयाच्या आत आम्हाला  रेंगपो सिंगताम राष्ट्रीय मार्ग गाठायचा होता. म्हणून शेजारीच असणाऱ्या तिस्ते वरील चार फूट रुंदी आणि जवळपास चारशे फूट लांबीच्या लोखंडी तारांवर टांगत्या असलेल्या पदचारी पुलाचा अवलंब केला. पावसाची रिपरिप वाढली होती. पुलावरून जितक्या वेगाने जाण्याचा प्रयत्न करीत तितकाच तो हेलकावे घेई. त्यातच पाय चिखलातून वर आल्यामुळे लोखंडी प्लेटवरून घसरत होते. अंततः  घाई टाळली आणि भिजणे पसंत केले. शेवटी मृत्यू शेवट असला तरी जपावं लागतंच कि... पुढे अंगावर येणारी चढण पार करून धापा टाकत वर चढलो. काही वेळात बस आली आणि  पुढचा प्रवास चालू झाला.
____या क्षेत्रात नागमोडी चढ उताराचे रस्ते पाहता छोट्या बसेस चालतात.बस मधे बसण्यास जागा नव्हती. पण ड्रायवर काकांनी त्यांच्या शेजारीच जागा करून दिली. रेंगपोला चहा घेण्यासाठी बसने दहा मिनिटांचा थांबा घेतला. चहाची चुस्की घेऊन मेल्लीच्या दिशेने बस निघाली. आता पावसाने मात्र जोर धरला होता. पावसाचे थेंब काचेवर आदळत होते. रस्त्याला बस  दिव्यांचा प्रकाश दाखवत पुढे मार्गक्रमण करीत होती.
____ सकाळी उदास पडलेला पचोळा चिंब भिजून टवटवीत झालेला दिसला. त्याच्या अंतरीचा दाह क्षणात वीज रूपाने चमकून त्या वृक्षांवर यातनांचा टाहो फोडून जाई. त्याची पुनरावृत्ती वारंवार होई. तद्वतच बस डाव्या कुशीवर वळली. त्या भयाण काळोख्या रानात भिजलेले उचं झाडांचे खोड दानवरूपी भासू लागले. नाभातून ओघळणाऱ्या अश्रूंच्या भाराने त्या खोडाच्या वजनी लोंबनाऱ्या फांद्या, त्याच्या सावटनाऱ्या अनंत भुजा भासू लागल्या. त्याचे पर्ण जणू अनंत लाळ गाळणाऱ्या लपलपणाऱ्या जीभा भासू लागल्या . मागे असणारे निष्पर्ण वृक्ष त्याच्या जटासम भासू लागले. मधेच पडणारा विजांचा प्रकाश त्याला आणखीनच चेतवून जाई. त्या पिकल्या  पानांचा आक्रोश त्याच्या जिव्हारी लागत असेल का?असा प्रश्न मनात येऊन गेला. अश्या दानवाच्या अधीन असण्यापेक्षा धरेच्या स्वाधीन होणं जर त्यांनी पसंत केलं तर त्यात कहीच वावगं नाही.   
_____बसच्या दिव्याच्या प्रकाशातून जणू परीसाचा स्पर्श होऊन ती पिकली पाने बावनकसी सोन्याप्रमाणे चमकू लागली. भिजल्या काळ्याशार जमिनीच्या उतरनीवर सोन्याची नक्षीदार सेज सजली होती. तरळ अश्रूंच्या ओलाव्याची चमक अधिक आकर्षित होती.  पण असल्या साज शय्येवर मान टाकून निजण्यास आज न कुणास उसंत, न कुणास त्याकडे पाहण्यास वेळ. आयुष्याच्या वाटेवर अशीच सोन्यासारखी माणसं आपल्याला आयुष्य देतात, आपल्या आयुष्यात येतात. आणि आपल्या सुखासाठी त्यागीसुद्धा होतात. आपल्याला त्याची जाणीव असणे गरजेचे आहे. शेवटी निर्जीव सोन्याच्या हव्यासापाई ( ऐश्वर्य )माणूस सोन्यासारखी सजीव माणसे गमावतो याचं दुःख आहे.
असो....
बहर और कहर में एक लब का भी फासला नहीं ।
जिंदगी और मौत कि तो मेरे हात में लगाम नहीं ।
जहर मैने हि बोया था शायद मेरे जिंदगी में...
लाख जखम भी गर दीये तुने, मुझे कुछ शिकवा नही ।

___नित (धनसार,पालघर)
९६३७१३८०३१

Tuesday, September 27, 2016

सिक्कीमच्या अशाही वाटा...

सिक्कीमच्या अशाही वाटा..
_______________________नित

नियतीने सुरुंग पेरावे
मी त्याच दिशेने जावे
वाटेतल्या धोंड्याना
तरी, मी का दोष द्यावे

​प्रवासाचा तिसरा दिवस रविवार 25 सप्टेंबरची पहाट. मी जरी तेवढ्यातच घुटमळत असलो तरी गाडीने मात्र मला दीड तास उशिरा का होईना, पश्चिम बंगाल मधील, शिलिगुडी शहरातील न्यू जलपाईगुडी स्टेशनला, सकाळी पाच वाजता पोहचवले. मुसळधार पाऊस स्वागतासाठी सज्ज होता. त्याचे अंग चोरत प्रतिक्षालाय गाठले. फ्रेश होऊन चहाची चुस्की घेतली आणि सात वाजता बाहेर पडलो.

पश्चिम बंगाल मधून सिक्कीमची राजधानी असलेल्या गँगटोक साठी प्रस्थान करणाऱ्या गाडीत बसलो.  इथून पुढचा प्रवास दाट डोंगरघाटातून असल्यामुळे इथून ट्रेनचा प्रवास नसून चाराचाकीने करावा लागणार होता. १० नं राष्ट्रीय महामार्गाची सोबत करून, तिथून ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मेल्ली गावापाशी असलेली सिक्कीमची बॉर्डर गाठली. तसा दीड तासाचा रस्ता.

या रस्त्याची खासियत म्हणाल तर उजव्या हातावर खोल दरीत गँगटोक हुन येणारी सिक्कीमची प्रसिद्ध तिस्ता नदी जी त्या डोंगर घाटांच्या दरीतून मनमौजी, मस्तीत वाहताना दिसते.जी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत जात पश्चिम बंगाल मधून ब्रह्मपुत्रेला मिळते. जागोजागी मनमोहक दृश्य निर्माण करते.ते दृश्य न्याहाळत प्रवासाची मजा द्विगुणित होते.या नदीच्या पात्रावर रियांग जवळ हॅंड्रो इलेक्टीकॅल प्रोजेक्ट हि कार्यान्वित आहे. सिक्कीमची जीवनदायिनी म्हणूनही तिला संबोधले जाते.

उजव्या हातावर जितकी खोल दरी आहे. तितकिच डाव्या हातावर उंच डोंगररांग अखंडित स्तिथ आहे. उंच उंच वृक्षांनी सजलेले घनदाट जंगल तिचे सौंदर्य आणखीन खुलवते. हि झाली जमेची बाजू पण पावसाळ्यात हे सौंदर्य अधिक खुलत असले तरी, ते सौंदर्य न्याहाळताना पाषाणातील पाषाण हृदयाला कधी पाझर फुटेल आणि पाषाणासकट पुढ्यात येईल याचाही नेम नसतो. मेल्ली पर्यँत जाताना एक दोन ठिकाणी त्याचा प्रत्ययहि आला.

वाट वळणाची, चढ उताराची,
उंच झाडांची गर्दी,त्यात पावसाची वर्दी,
दरी खोऱ्यातून वाहे,बघा सरितेचे पाणी,
निर्मित विद्युत लहरी,जाते गंगेच्या घरी,
खाईत जेवढ्या खस्ता,तेवढी हसते तिस्ता,
जीवनदायिनी सिक्कीमची,जाते शोधत रस्ता,
सौंदर्य तिचे अफाट,डोंगर दाऱ्यांमधी,
खुलुन दिसते भलतेच, बघा प्रजन्य वर्षामधी.

मेल्लीला साडे नऊला पोहचून गाडी बदलली. प्रवास होता नदी क्रॉस करून जोरथान्ग कडे. तो हि प्रवास जोरथान्ग कडून येणाऱ्या रंगीत नदीच्या सोबतीने. हि नदी मेल्लीला तिस्ता नदीत समर्पित होते.रंगीत नदी म्हणजेच पश्चिम बंगाल आणि सिक्कीमची सीमारेषा. नदीच्या पलीकडे सिक्कीम चेकपोस्ट वर सर्वांचे ओळखपत्र पडताळले. पावसाची रिपरिप चालू होती. काही अंतर पार केल्यावरच हा रस्ता नियोजित ठिकाणी पोहचवेल कि नाही या शंकेची पाल मनात चुकचुकली.

महाकाय पहाडावरून जागोजागी दरडी कोसळलेल्या.  कमी अधिक प्रमाणात कोसळत होत्या. दगडी आणि मातीने रस्त्यात पार चिखल झालेला.जागोजागी रस्त्यावर दरडींचे ढीग होते. त्या गाडीत जीव मुठीत घेऊन बसलो होतो.गाडीचा ड्रायवर मात्र समोर कमी आणि खिडकीतून बाहेर वर डोंगर उतारीवर जास्त लक्ष देऊन होता. अखेर गाडी अश्या टप्प्यावर येऊन उभी राहिली जिथे भर रस्त्यात चिखलाचा जवळ जवळ एक फूट खच पडलेला.

पाषाण उरावर, सौंदर्य राज करतो,
हिरवे रान नभात,मेघ खेळवतो,
वरूण राजा हर्षुन,शिडकाव प्रेमाचा करतो,
पाषाणाला भेदून, माणूस वाट करतो,
दृष्ट लागते कोणाची, का काळ घात करतो,
पाझरत्या हृदयाचा, बांध तुटून पढतो,
जीव मुठीत घेऊन, चाकरमानी लढतो,
चंद्रावर गेला माणूस, निसर्गापुढे हरतो,
पुन्हा उठतो पुन्हा लढतो, पुन्हा पुन्हा तो हरतो.

पावसाची बुंदबंदी चालूच होती. पुढे एक ट्रक पास झाला आणि आमचीही गाडी पुढे सरसावली, वीसएक मीटर चालून गाडी तिथेच रुळली. पूढसा रस्ता बहुतेक तिला नकोसा झाला. पुढे नेण्याच्या प्रयत्नात ती आणखीनच फसली. त्या गाडीच्या रुपाने आमचं आयुष्यच तिथे फसलं होतं. वरून येणारे पाणी कधी आपल्या सोबत दरड घेऊन येईल याचा नेम नाही. मागे जाण्याचा तर प्रश्नच नव्हता. मागे गाड्यांची रीघ होती.शेवटचा पर्याय म्हणून त्या चिखलात गाडीला धक्का मारण्यासाठी आम्ही सारेच उतरलो. तरी काही वळेना.अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर गाडी तीस मीटर पुढे सरकून त्यातल्या त्यात कमी चिखल रस्त्यावर गाडी बाहेर निघाली होती.आम्ही पावसाने कमी आणि घामाने अंग जास्त भिजले होते.

तसेच चिखल माखल्या पायाने गाडीत बसलो आणि पुढचा काहीसा त्याच मोलाचा रास्ता कमी करण्याच्या दिशेने गाडी मार्गस्थ झाली. विशेष म्हणजे जागोजागी सिक्कीम शासनाचे jcb होते पण कळलं कि रविवारची सुट्टी मनवण्यात प्रशासन दंग आहे. त्यांना जनहितापेक्षा स्वहित जास्त महत्वाचं वाटत असावं... आणि चाकरमान्यांना नोकरीची चिंता.

ड्रॉयवरला विचारलं तर म्हणाला हा आयुष्याचा जुगार आम्हाला पावसाळ्यात दिवसातून आठ दहा वेळा खेळवाच लागतो. त्यात आतापर्यंत तरी आम्हीच जिंकत आलोत. पुढे त्या निसर्गाची इच्छा... एव्हाना आम्ही जोरथान्गला पोहचलो आणि सुटकेचा निःश्वास सोडला.
...नितेश पाटील

Tuesday, September 6, 2016

संत तुकाराम डेकोरेशन

शिवा डेकोरेशन

​#शिवा_डेकोरेशन_ग्रुप_धनसार_पालघर
प्रो. शिवनाथ घरत

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन करण्यामागची लोकमान्य टिळकांची भूमिका तेव्हा त्या परिस्तिथीला रास्त होती. आज बाप्पाची होणारी विटंबना पाहून मन खिन्न होते. त्यातूनच काही मंडळे सुशोभीकरण, विविध स्पर्धा, चलचित्र सजावट करून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात. शिवा डेकोरेशन ग्रुप धनसार गत वीस वर्षापासून, आणि त्या समूहात मी गत पंधरा वर्षापासून अखंडित दरवर्षी दोन महिन्याच्या अथक परिश्रमातून   आठ ते दहा ठिकाणी चलचित्र सजावट साकार करून गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने समाजास एक सुसंदेश देण्याचा प्रयत्न करत असतो.(समूह महत्वाचा)
त्यातूनच आम्ही साकारलेले चलचित्र १

#संत_तुकाराम

संत तुकोबारायांचे जीवन म्हणजे सतत, अनंत, अथांग विठ्ठलभक्ती आणि ती केवळ अंत:करणात व वाणीत नव्हे, तर कृतीतूनही ते व्यक्त करणारे. त्यांच्या काही अभंगांच्या एकेका चरणावरूनही एक समृद्ध आशय आपल्यासमोर येतो. संत कुणालाही होता येत नाही. त्यासाठी जगाने दिलेला विषाचा प्याला हसतमुख प्राशन करावा लागतो. त्यातून येणारी गरळ सुद्धा समाजहिताची, इश्वरनिष्ठ असणे गरजेचे आहे. आणि तुकोबा म्हणजे संतश्रेष्ठ.

‘जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले।।
तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।

संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ। नाही तळमळ दु:खलेश।।

तुका म्हणे तोची संत। सोशि जगाचे आघात।।

महापुरे झाडे जाती। तेथे लव्हाळे वाचती।।

ऐसी कळवळयाची जाति। करी लाभाविण प्रीती।।

सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे।।

शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी।।

आणि त्यांचा हाच मानवतावाद सत्ताधाऱ्यांच्या वचनी पडणे अवघड होते, म्हणूनच सत्ताधाऱ्यांच्या ननेतृत्वाखाली तुकोबारायांना त्यांच्या अभंगाच्या गाथा नदीत बुडविण्याची आज्ञा झाली. पण तुकोबांचे अभंग म्हणजे ज्याचा भंग होत नाही असे अविनाशी तत्व. वाणी म्हणजे सरस्वती, हि विद्या व ज्ञानाची देवता. आणि ज्ञान हे कधीच नष्ट होत नाही, म्हणूनच इंद्रायणीने तुकाराम महाराजांची अभंग गाथा तेरा दिवसात जशी च्या तशी तुकोबांना सुपूर्द केली. तेच दृश्य चलचित्राच्या माध्यमातून साकारले आहे.

जो होई विठ्ठलाचा, तोचि होय विठ्ठल
पाचवा वेद, अभंगवाणी तुकीयाची
भागवत धर्माचा तो कळस
...नित

नितेश पाटील ( धनसार,पालघर)

Sunday, September 4, 2016

बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया...

शेष काही घटिका
       लगबग वाढली आता
येतील बाप्पा आज
       उद्या चतुर्थीचा सोहळा

...नित

Monday, June 13, 2016

नकळत्या कर्माची फळ...

●नकळत्या कर्माची फळं...●
        निसर्ग आपल्याला बरेच काही शिकवत असतो. निसर्ग सानिध्यात बरेच... नव्हे सर्वच जीव आश्रित आहेत. आणि त्या सार्यांनाच त्याची अनुभुती येत असते. निसर्गाच्या समवेत जगण्याची मजा औरच... पण आज माणूस इतका प्रगत झाला कि तो त्या निसर्गाला आव्हान देऊ लागला. काँक्रेटच जग उभं करण्यासाठी अगणित झाडांची कत्तल केली जात आहे. आणि त्याचे परिणामही भोगतो आहे पण सुधारेल तो माणूस कसला...
         असो...काही दिवसांपूर्वीच आजोळात काकांच्या घरामागे झाडांच्या साफसुथऱ्या गर्दीत एक शर्थीचे आव्हान पहावयास मिळाले... पपईच्या एका झाडावर दोन गोंडस पक्षी ज्याला आम्ही बुलबुल म्हणतो, रोज येऊन बसत... मागे सतत पाण्याचा निचरा आणि बाकी इतर झाडांची सावली, त्यामुळे तिथे सतत कडकडत्या उन्हातही थंडावा असतो... एकंदरीतच त्यांनी ती जागा हवेशीर आणि माणसाळलेली पाहून आपले घरटे बांधण्याचा निर्णय घेतला.
          आता जागा निवडली ती पपईच्या झाडाच्या थेट शेंड्यावर. म्हणजे कुणाचं तिथे चढणं नाही कि पाहणं नाही असं बुलबुलना वाटलं. रोज थोडं थोडं करून तीन दिवसानंतर घरट्याला घरपण आले. सुरेख असे वाऱ्याने पपईबरोबर हरकत करणारे साजेशे घर. त्यांना माहित होतं इथं माणसांपासून आपल्याला काही धोका नाही. दोघंही तिथे नांदू लागले. चौथ्या दिवशी त्या घरट्यात एक अंड्याची भर झाली. चिमुकला जीव आईच्या गर्भातून जगात आईच्या प्रेमाच्या आवरणात बंदीस्त असूनही निर्धास्त त्या गोजिरवाण्या घरात स्तिथ झाला. दुसऱ्या दिवशी दुसरा, तिसऱ्या दिवशी तिसरा. असं करता दोघांच्या संसारात आणखीन तीन बुलबुलच्या तारा नवे स्वर छेडण्यासाठी सज्ज झाल्या. त्यांना फक्त मायेच्या उबेची गरज होती.
        आणि काळाने घात केला. निसर्गाने आपले हात उंचावले. पपईने आकाशाला भिडण्यासाठी एक पाऊल वर उचलले...या जगात कुणीही कुणासाठी थांबत नसतो....राहते घरटे एका कुशीवर वळू लागले...जणू धरीत्रीकडे पाहण्यास ते वळले...नवे स्वर छेडणाऱ्या तारा आपसूकच कंपू लागल्या...  तीन तारातील एक तार छेडली गेली... त्या कंपणाने घरट्यातून ती जमिनीकडे आकर्षित झाली...आपल्या मायेची उब सोडून धरीत्रीच्या चरणी ठप...चा स्वर बोलून विस्कळीत पसरली.... पुन्हा कधीच न उमटण्यासाठी...
       पण वर बुलबुलच्या अंतरीचे, आईच्या आर्ततेचे स्वर टाहो फोडत होते... विस्कटलेल्या स्वरांना संजीवनी देण्याचा अशक्यप्राय प्रयत्न वारंवार करत होते. त्यातच दुसऱ्या दिवशी दुसरे...पुन्हा तोच आक्रोश...काय गुन्हा..., म्हणून त्या ईश्वराला कोसीत होते...विसरले होते...त्या मोहमायेत दुसऱ्याच्या उरावर आपण बस्तान केले आहे...त्याचाही उर भरून येईल...तो हि जगण्याची धडपड करेल...आणि त्या वेळेस आपण असूनही नसल्यासारखे असू... आयुष्याचा खेळ कधी कलाटणी मारून जाईल सांगता येत नाही.
        तात्पर्य :- जगण्याचा अधिकार सार्यांनाच असतो, प्रत्येकाने प्रत्येकाचा मान ठेऊनच जगलं पाहिजे. नकळत झालेल्या कर्माची सुद्धा फळं भोगावीच लागतात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपणच ओढवलेली असते. इतरांना दोष देण्यात अर्थ नसतो.
...नित
नितेश पाटील (धनसार,पालघर)

शिक्षण आजचे...

शिक्षण आजचे...
________________________नित
          आज शिक्षण या विषयावर विश्लेशण करणारी सुज्ञ माणसं खूप आहेत.पण ती असली आणि त्यातुन बोध घेणारी सुशीक्षीत माणसं असली तरी ह्या स्पर्धेच्या जगात ही जीवनाची विस्कटलेली घडी आपण व्यवस्थीत करु शकतो ? कुठल्याही पालकांना विचारा कि...
'' किती हा मुलांचा अभ्यास, नाही ..?,
आपल्या वेळी एवढा नव्हता..!! "
"हो, खरं आहे.. पण स्पर्धेत टीकायचं असेल तर करावाच लागणार." हे उत्तर...ते चुकीचं नाहीये म्हणा...पण नेमकि शिक्षण पद्धती कशी असायला हवी यावर विचार करायला हवा. आजचं शिक्षण फक्त स्वतःसाठी आहे.
          पूर्वी शाळांची मारामार असे. शिक्षण सर्वाना सारखं मिळावं म्हणून कितीतरी समाजसुधारकाना समाजाविरुद्ध लढावं लागलं, पण आज परिस्तिथी बदललेली आहे. आज शाळेना उत आलाय. आता शाळा सुरु केल्या आहेत गुंतवणूकदारांनी. मागणी तसा पुरवठा ह्या तत्वावर. पालकांना आपल्या मुला-मुलीला रेसचा घोडा बनवायचं आहे ही मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केली. दप्तराचं आणि पालक-शिक्षकांचं अपेक्षांचं ओझं वाहणारी मुले म्हणजे चालती बोलती प्रेते बनत चालली आहेत.
       माझी भाची यंदा पाहिलीला गेली. तिची इंग्लिश माध्यमातील इयत्ता पहिलीची पुस्तकं पाहून वाटलं कि हा निरागस लहानसा जीव त्या पुस्तकांचे ओझे कसे सांभाळणार... त्यातील इंग्लिशमधील वाक्यरचना... ती आकडेमोड... सारं त्या जीवा पलीकडचं... तरीही तिला ते ओझं उचलावच लागणार... सकाळी उठून शाळा... शाळेतून आली कि क्लास....क्लास वरून आली कि दोन्हींचे गृहपाठ...झाला भरला दिवस... हा नित्यक्रम चालूच राहणार... आणि दिवसभराच्या शैक्षणिक ज्ञान मिळवण्यासाठी त्या चिमुरडीचे उध्वस्थ झालेले बाळपण...परिणामी होणारी आईवडिलांचीही दगदग...त्या सर्वांचे रुपये आपण शैक्षणिक स्वंस्थाना भरायचे...किती ते सार्यांना माहित आहेच...स्वस्थेचं नाव तसा रुपया...
        भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षण तज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरु झाला. मोठे उद्योजग, पुढार्यांनी शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला धूळ चारली. एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या ऍडमीनेशनची तयारी सुरु होते. कृष्णाला जन्मण्याआधी मारायची तयारी मामाने केली होती. आता मुल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा घोडा बनवायची तयारी सुरु होते.
      आज समाज्यात जे आयकॉन आहेत त्यांचं ते अनुकरण अचूक करतील. पण स्वताची ओळख निर्माण करणार नाहीत. कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं. जगायची कला, गीत-संगीतातील आनंद, निसर्गसंपदेची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार, साहित्य ह्याला बाजारू किंमत नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळतंय, त्यात ते पारंगत होत आहेत. बहुतांशी मुलांना जास्त पगाराच्या नोकऱ्याही मिळतात पण त्यात देशाचं नाही, भांडवलदारांच हित साधलं जातंय. पुढची पिढी मोठी पदवी मिळवेल पण न स्वत जगण्याचा आनंद लुटू शकतील, न दुसर्याला जगण्याची मजा मिळू देतील. आज देश जिथे सुशिक्षित आहे तिथे भ्रष्टाचार आहेच, अनैतिकता, वृद्धाश्रम...काय कमी आहे. काहीच नाही..!! नेमका समाज सुशिक्षित कसा होतो ते काही मला कळलेलं नाही. असो माझंही अज्ञान असेल...
       इतर देशातील शिक्षण धोरणांवर एक लेख माझ्या वाचनात आला होता,  कुठे आठवत नाही पण काही मुद्दे आठवतात. खरं खोट्यापेक्षा मुद्दे महत्वाचे आहेत. सुशिक्षित अज्ञानाचा धोका ओळखून जपानमध्ये मुलांना घोकंपट्टी पेक्षा प्रॅक्टिकलवर भर देतात. वृक्ष-वेली स्वताच अन्न स्वत तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात?...असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर भाजी लावायला शिकवतात. त्या रोपांची-वेलींची जोपासना करायला लावतात. जर्मनी मुलांना परदर्शकतेच शिक्षण देते. तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेवून दुसरी पर्यंत लेखन करू देत नाहीत. पाचवीपर्यंत प्रॅक्टिकल चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई सेविका, प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल ह्याची सतत तपासणी होते. दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्रांच प्रशिक्षण देतात. सगळे एकदम सायन्स मध्ये भरत नाहीत. अनावश्यक विषय शिकवत नाहीत. चीन हा सायकल प्रेमी देश. ४ वर्षाच्या मुलांना सायकल चालवण्याच शिक्षण देतो. त्यानंतर थेरी कमी आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात. प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालवणार हाच विचार ते देश करतात. एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत. चारी दिशांनी अनेक विषय आणि क्लासचा मारा सोसण्याच काम भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते.
      रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात पहा.
टागोरांची "शांतीनिकेतन" शाळा झाडांखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई. एकदा टागोर झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्या समोर पुस्तकात डोक खुपसून बसली होती. आणि उरलेली बरीच मुले खेळत-बागडत होती.  कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सुगंध घेत फिरत होता. तेवड्यात एक पालक तिथे आले. पाहतात तर काय...गुरुदेव शांतपणे बसले होते आणि फक्त चार मुले पुस्तकात डोके खुपसून बसली होती व इतर मुले हसण्यात-नाचण्यात रमली होती. सुटा-बुटातील पालक महाशय टागोरांना म्हणाले- “या नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का?”
टागोर म्हणाले- “चिंता वाटते, पण नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांची नाही तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या मुलांची. ही मुले खेळण्या-बागडण्याच्या वयात मोठ्या माणसासारखी वागत आहेत. ही मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत. प्रौढ तर मीसुद्धा अजून झालो नाही. खरं तर मलाही झाडावर चढाव असं वाटतं. पक्ष्यांशी बोलावसं वाटत. भरपूर खेळावस वाटतं. पण माझ शरीर आता साथ देत नाही. “
      रवींद्रनाथ टागोर जगण्यासाठी शिकवत होते. आता शिकण्यासाठी जगावे लागते. जास्त ज्ञान, जास्त कला घेवून मुले धावत असतात.
आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात ! मग एक रेस सुरु होते आणि जगायचं राहून जातं !!
पण ईतर देशातील शिक्षण पद्धती भारतात का वापरली जात नाही ? त्या देशातील ( पेहराव ,भाषा,संस्कृती, model,smart city,bulet train,ईतर ) अनावश्यक म्हणता नाही येणार..!! पण शिक्षण पद्धती का नाही ?

अज्ञान मी
ज्ञानी जग सारे
शिशु वयात थोरपण
बालपण हरवले का रे
...नित
नितेश पाटील (धनसार,पालघर)