Sunday, February 7, 2016

न मागताही होईल मतदान तेव्हा

न मागता होईल मतदान जेव्हा ...!!!

येते मतदान जेव्हा जेव्हा ..!!!
असंख्य प्रश्नांचा डोंगर उभा राहतो...
आयुष्य माझे भयाण काळी रात्र...
रोजच जगणे तेच मरणे माझे...
अशा काळोख्या रात्री अचानक...
उल्कांचा वर्षाव चालू होतो...
उजेड काही क्षणापूर्तीचे
अवचित देऊन जातो
मी धुंडत राहतो त्याला
तो लुप्त होतो...
काय कुणाशी साटेलोटे ...?
संग कुणाशी बांधतो...?
दिसतो काही क्षण
मग तो विरून जातो...
लुप्त होण्याआधी
मजकडे मागून जातो..
मी नकार देतो..!!
फकीर मी
काय मागतो मजकडे..?
राजा भोज असूनही
का पसरले हात तुझे..?
देऊनही माझे मत तू विसरलास मला..!!
पाच वर्षांनी पोस्टरवर दाखवतो तोंड मला..
का न आली कधी कीव माझी तुला..?
त्याच त्याच यातना
रोज मी सहन करतो...
ऊन पावसात निवारा शोधत फिरतो...
उकिरड्यावर उष्टावली वेचत हिंडतो...
गरिबीची लक्तरे अंगावर फाटलेली..
साऱ्यांचा नाथ
का मी अनाथ आहे..?
नतद्रष्ट लोकांनी टाकलेली
का मी कात आहे..?
जातोस पायदळी तुडवून
मी सहन केले..
काय थट्टा लावलेय
मी कोण आहे..?
असतील मंत्री संत्री मला काय त्याचे..
त्यांना फौजफाटा ?
माझी वणवण आहे..
उधळतोस संपत्ती कोणाची आहे..?
करोडो अब्जावधींची धनदौलत तुमची
भुकबळी, गरीबी तशीच.?
सामान्य माणूस अजूनही पिसतो..?
योजनेंचे इमले राहिले कागदांवर
लाल, निळ्या कागदांनी केले मतांतर
घोषणांचा नुसता गडगडाट आहे
राजरोज पार्टयांचा सुळसुळाट आहे
बाटल्या बकऱ्यांचा रोज मान आहे
भविष्य देशाचे ज्यांच्या हाती
अंशतः त्यांनीच केली बर्बाद पिढी आहे
जनहितार्थ असे केले असेल काही
विचार तुलाच ..!!
का ते पुरेसे आहे..?
स्वातंत्रेत्तोर सरली कैक वर्ष तरी
हेळसांड जनाची का अजुन आहे.?
पण आता नागरीक सुजाण आहे
भुलथापना लागणार ती चपराक आहे
विकला जाणार नाही तो सज्ञान आहे
उधळतोस दौलत तू जी वारेमाप
आली कुठून..?
पुढे येणार कुठून..?
त्यास माहित आहे...
विनियोग करशील तू सत्तेचा जेव्हा
न मागताही मिळेल ...
मत तुला तेव्हा...
वाट मी आजही पाहतो त्या दिनाची
न मागतही होईल मतदान जेव्हा....!!!!
न मागतही होईल मतदान जेव्हा....!!!!
......नितेश पाटील (पालघर,धनसार)
९६३७१३८०३१

No comments: