Tuesday, September 27, 2016

सिक्कीमच्या अशाही वाटा...

सिक्कीमच्या अशाही वाटा..
_______________________नित

नियतीने सुरुंग पेरावे
मी त्याच दिशेने जावे
वाटेतल्या धोंड्याना
तरी, मी का दोष द्यावे

​प्रवासाचा तिसरा दिवस रविवार 25 सप्टेंबरची पहाट. मी जरी तेवढ्यातच घुटमळत असलो तरी गाडीने मात्र मला दीड तास उशिरा का होईना, पश्चिम बंगाल मधील, शिलिगुडी शहरातील न्यू जलपाईगुडी स्टेशनला, सकाळी पाच वाजता पोहचवले. मुसळधार पाऊस स्वागतासाठी सज्ज होता. त्याचे अंग चोरत प्रतिक्षालाय गाठले. फ्रेश होऊन चहाची चुस्की घेतली आणि सात वाजता बाहेर पडलो.

पश्चिम बंगाल मधून सिक्कीमची राजधानी असलेल्या गँगटोक साठी प्रस्थान करणाऱ्या गाडीत बसलो.  इथून पुढचा प्रवास दाट डोंगरघाटातून असल्यामुळे इथून ट्रेनचा प्रवास नसून चाराचाकीने करावा लागणार होता. १० नं राष्ट्रीय महामार्गाची सोबत करून, तिथून ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मेल्ली गावापाशी असलेली सिक्कीमची बॉर्डर गाठली. तसा दीड तासाचा रस्ता.

या रस्त्याची खासियत म्हणाल तर उजव्या हातावर खोल दरीत गँगटोक हुन येणारी सिक्कीमची प्रसिद्ध तिस्ता नदी जी त्या डोंगर घाटांच्या दरीतून मनमौजी, मस्तीत वाहताना दिसते.जी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत जात पश्चिम बंगाल मधून ब्रह्मपुत्रेला मिळते. जागोजागी मनमोहक दृश्य निर्माण करते.ते दृश्य न्याहाळत प्रवासाची मजा द्विगुणित होते.या नदीच्या पात्रावर रियांग जवळ हॅंड्रो इलेक्टीकॅल प्रोजेक्ट हि कार्यान्वित आहे. सिक्कीमची जीवनदायिनी म्हणूनही तिला संबोधले जाते.

उजव्या हातावर जितकी खोल दरी आहे. तितकिच डाव्या हातावर उंच डोंगररांग अखंडित स्तिथ आहे. उंच उंच वृक्षांनी सजलेले घनदाट जंगल तिचे सौंदर्य आणखीन खुलवते. हि झाली जमेची बाजू पण पावसाळ्यात हे सौंदर्य अधिक खुलत असले तरी, ते सौंदर्य न्याहाळताना पाषाणातील पाषाण हृदयाला कधी पाझर फुटेल आणि पाषाणासकट पुढ्यात येईल याचाही नेम नसतो. मेल्ली पर्यँत जाताना एक दोन ठिकाणी त्याचा प्रत्ययहि आला.

वाट वळणाची, चढ उताराची,
उंच झाडांची गर्दी,त्यात पावसाची वर्दी,
दरी खोऱ्यातून वाहे,बघा सरितेचे पाणी,
निर्मित विद्युत लहरी,जाते गंगेच्या घरी,
खाईत जेवढ्या खस्ता,तेवढी हसते तिस्ता,
जीवनदायिनी सिक्कीमची,जाते शोधत रस्ता,
सौंदर्य तिचे अफाट,डोंगर दाऱ्यांमधी,
खुलुन दिसते भलतेच, बघा प्रजन्य वर्षामधी.

मेल्लीला साडे नऊला पोहचून गाडी बदलली. प्रवास होता नदी क्रॉस करून जोरथान्ग कडे. तो हि प्रवास जोरथान्ग कडून येणाऱ्या रंगीत नदीच्या सोबतीने. हि नदी मेल्लीला तिस्ता नदीत समर्पित होते.रंगीत नदी म्हणजेच पश्चिम बंगाल आणि सिक्कीमची सीमारेषा. नदीच्या पलीकडे सिक्कीम चेकपोस्ट वर सर्वांचे ओळखपत्र पडताळले. पावसाची रिपरिप चालू होती. काही अंतर पार केल्यावरच हा रस्ता नियोजित ठिकाणी पोहचवेल कि नाही या शंकेची पाल मनात चुकचुकली.

महाकाय पहाडावरून जागोजागी दरडी कोसळलेल्या.  कमी अधिक प्रमाणात कोसळत होत्या. दगडी आणि मातीने रस्त्यात पार चिखल झालेला.जागोजागी रस्त्यावर दरडींचे ढीग होते. त्या गाडीत जीव मुठीत घेऊन बसलो होतो.गाडीचा ड्रायवर मात्र समोर कमी आणि खिडकीतून बाहेर वर डोंगर उतारीवर जास्त लक्ष देऊन होता. अखेर गाडी अश्या टप्प्यावर येऊन उभी राहिली जिथे भर रस्त्यात चिखलाचा जवळ जवळ एक फूट खच पडलेला.

पाषाण उरावर, सौंदर्य राज करतो,
हिरवे रान नभात,मेघ खेळवतो,
वरूण राजा हर्षुन,शिडकाव प्रेमाचा करतो,
पाषाणाला भेदून, माणूस वाट करतो,
दृष्ट लागते कोणाची, का काळ घात करतो,
पाझरत्या हृदयाचा, बांध तुटून पढतो,
जीव मुठीत घेऊन, चाकरमानी लढतो,
चंद्रावर गेला माणूस, निसर्गापुढे हरतो,
पुन्हा उठतो पुन्हा लढतो, पुन्हा पुन्हा तो हरतो.

पावसाची बुंदबंदी चालूच होती. पुढे एक ट्रक पास झाला आणि आमचीही गाडी पुढे सरसावली, वीसएक मीटर चालून गाडी तिथेच रुळली. पूढसा रस्ता बहुतेक तिला नकोसा झाला. पुढे नेण्याच्या प्रयत्नात ती आणखीनच फसली. त्या गाडीच्या रुपाने आमचं आयुष्यच तिथे फसलं होतं. वरून येणारे पाणी कधी आपल्या सोबत दरड घेऊन येईल याचा नेम नाही. मागे जाण्याचा तर प्रश्नच नव्हता. मागे गाड्यांची रीघ होती.शेवटचा पर्याय म्हणून त्या चिखलात गाडीला धक्का मारण्यासाठी आम्ही सारेच उतरलो. तरी काही वळेना.अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर गाडी तीस मीटर पुढे सरकून त्यातल्या त्यात कमी चिखल रस्त्यावर गाडी बाहेर निघाली होती.आम्ही पावसाने कमी आणि घामाने अंग जास्त भिजले होते.

तसेच चिखल माखल्या पायाने गाडीत बसलो आणि पुढचा काहीसा त्याच मोलाचा रास्ता कमी करण्याच्या दिशेने गाडी मार्गस्थ झाली. विशेष म्हणजे जागोजागी सिक्कीम शासनाचे jcb होते पण कळलं कि रविवारची सुट्टी मनवण्यात प्रशासन दंग आहे. त्यांना जनहितापेक्षा स्वहित जास्त महत्वाचं वाटत असावं... आणि चाकरमान्यांना नोकरीची चिंता.

ड्रॉयवरला विचारलं तर म्हणाला हा आयुष्याचा जुगार आम्हाला पावसाळ्यात दिवसातून आठ दहा वेळा खेळवाच लागतो. त्यात आतापर्यंत तरी आम्हीच जिंकत आलोत. पुढे त्या निसर्गाची इच्छा... एव्हाना आम्ही जोरथान्गला पोहचलो आणि सुटकेचा निःश्वास सोडला.
...नितेश पाटील

Tuesday, September 6, 2016

संत तुकाराम डेकोरेशन

शिवा डेकोरेशन

​#शिवा_डेकोरेशन_ग्रुप_धनसार_पालघर
प्रो. शिवनाथ घरत

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन करण्यामागची लोकमान्य टिळकांची भूमिका तेव्हा त्या परिस्तिथीला रास्त होती. आज बाप्पाची होणारी विटंबना पाहून मन खिन्न होते. त्यातूनच काही मंडळे सुशोभीकरण, विविध स्पर्धा, चलचित्र सजावट करून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात. शिवा डेकोरेशन ग्रुप धनसार गत वीस वर्षापासून, आणि त्या समूहात मी गत पंधरा वर्षापासून अखंडित दरवर्षी दोन महिन्याच्या अथक परिश्रमातून   आठ ते दहा ठिकाणी चलचित्र सजावट साकार करून गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने समाजास एक सुसंदेश देण्याचा प्रयत्न करत असतो.(समूह महत्वाचा)
त्यातूनच आम्ही साकारलेले चलचित्र १

#संत_तुकाराम

संत तुकोबारायांचे जीवन म्हणजे सतत, अनंत, अथांग विठ्ठलभक्ती आणि ती केवळ अंत:करणात व वाणीत नव्हे, तर कृतीतूनही ते व्यक्त करणारे. त्यांच्या काही अभंगांच्या एकेका चरणावरूनही एक समृद्ध आशय आपल्यासमोर येतो. संत कुणालाही होता येत नाही. त्यासाठी जगाने दिलेला विषाचा प्याला हसतमुख प्राशन करावा लागतो. त्यातून येणारी गरळ सुद्धा समाजहिताची, इश्वरनिष्ठ असणे गरजेचे आहे. आणि तुकोबा म्हणजे संतश्रेष्ठ.

‘जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले।।
तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।

संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ। नाही तळमळ दु:खलेश।।

तुका म्हणे तोची संत। सोशि जगाचे आघात।।

महापुरे झाडे जाती। तेथे लव्हाळे वाचती।।

ऐसी कळवळयाची जाति। करी लाभाविण प्रीती।।

सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे।।

शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी।।

आणि त्यांचा हाच मानवतावाद सत्ताधाऱ्यांच्या वचनी पडणे अवघड होते, म्हणूनच सत्ताधाऱ्यांच्या ननेतृत्वाखाली तुकोबारायांना त्यांच्या अभंगाच्या गाथा नदीत बुडविण्याची आज्ञा झाली. पण तुकोबांचे अभंग म्हणजे ज्याचा भंग होत नाही असे अविनाशी तत्व. वाणी म्हणजे सरस्वती, हि विद्या व ज्ञानाची देवता. आणि ज्ञान हे कधीच नष्ट होत नाही, म्हणूनच इंद्रायणीने तुकाराम महाराजांची अभंग गाथा तेरा दिवसात जशी च्या तशी तुकोबांना सुपूर्द केली. तेच दृश्य चलचित्राच्या माध्यमातून साकारले आहे.

जो होई विठ्ठलाचा, तोचि होय विठ्ठल
पाचवा वेद, अभंगवाणी तुकीयाची
भागवत धर्माचा तो कळस
...नित

नितेश पाटील ( धनसार,पालघर)

Sunday, September 4, 2016

बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया...

शेष काही घटिका
       लगबग वाढली आता
येतील बाप्पा आज
       उद्या चतुर्थीचा सोहळा

...नित

Monday, June 13, 2016

नकळत्या कर्माची फळ...

●नकळत्या कर्माची फळं...●
        निसर्ग आपल्याला बरेच काही शिकवत असतो. निसर्ग सानिध्यात बरेच... नव्हे सर्वच जीव आश्रित आहेत. आणि त्या सार्यांनाच त्याची अनुभुती येत असते. निसर्गाच्या समवेत जगण्याची मजा औरच... पण आज माणूस इतका प्रगत झाला कि तो त्या निसर्गाला आव्हान देऊ लागला. काँक्रेटच जग उभं करण्यासाठी अगणित झाडांची कत्तल केली जात आहे. आणि त्याचे परिणामही भोगतो आहे पण सुधारेल तो माणूस कसला...
         असो...काही दिवसांपूर्वीच आजोळात काकांच्या घरामागे झाडांच्या साफसुथऱ्या गर्दीत एक शर्थीचे आव्हान पहावयास मिळाले... पपईच्या एका झाडावर दोन गोंडस पक्षी ज्याला आम्ही बुलबुल म्हणतो, रोज येऊन बसत... मागे सतत पाण्याचा निचरा आणि बाकी इतर झाडांची सावली, त्यामुळे तिथे सतत कडकडत्या उन्हातही थंडावा असतो... एकंदरीतच त्यांनी ती जागा हवेशीर आणि माणसाळलेली पाहून आपले घरटे बांधण्याचा निर्णय घेतला.
          आता जागा निवडली ती पपईच्या झाडाच्या थेट शेंड्यावर. म्हणजे कुणाचं तिथे चढणं नाही कि पाहणं नाही असं बुलबुलना वाटलं. रोज थोडं थोडं करून तीन दिवसानंतर घरट्याला घरपण आले. सुरेख असे वाऱ्याने पपईबरोबर हरकत करणारे साजेशे घर. त्यांना माहित होतं इथं माणसांपासून आपल्याला काही धोका नाही. दोघंही तिथे नांदू लागले. चौथ्या दिवशी त्या घरट्यात एक अंड्याची भर झाली. चिमुकला जीव आईच्या गर्भातून जगात आईच्या प्रेमाच्या आवरणात बंदीस्त असूनही निर्धास्त त्या गोजिरवाण्या घरात स्तिथ झाला. दुसऱ्या दिवशी दुसरा, तिसऱ्या दिवशी तिसरा. असं करता दोघांच्या संसारात आणखीन तीन बुलबुलच्या तारा नवे स्वर छेडण्यासाठी सज्ज झाल्या. त्यांना फक्त मायेच्या उबेची गरज होती.
        आणि काळाने घात केला. निसर्गाने आपले हात उंचावले. पपईने आकाशाला भिडण्यासाठी एक पाऊल वर उचलले...या जगात कुणीही कुणासाठी थांबत नसतो....राहते घरटे एका कुशीवर वळू लागले...जणू धरीत्रीकडे पाहण्यास ते वळले...नवे स्वर छेडणाऱ्या तारा आपसूकच कंपू लागल्या...  तीन तारातील एक तार छेडली गेली... त्या कंपणाने घरट्यातून ती जमिनीकडे आकर्षित झाली...आपल्या मायेची उब सोडून धरीत्रीच्या चरणी ठप...चा स्वर बोलून विस्कळीत पसरली.... पुन्हा कधीच न उमटण्यासाठी...
       पण वर बुलबुलच्या अंतरीचे, आईच्या आर्ततेचे स्वर टाहो फोडत होते... विस्कटलेल्या स्वरांना संजीवनी देण्याचा अशक्यप्राय प्रयत्न वारंवार करत होते. त्यातच दुसऱ्या दिवशी दुसरे...पुन्हा तोच आक्रोश...काय गुन्हा..., म्हणून त्या ईश्वराला कोसीत होते...विसरले होते...त्या मोहमायेत दुसऱ्याच्या उरावर आपण बस्तान केले आहे...त्याचाही उर भरून येईल...तो हि जगण्याची धडपड करेल...आणि त्या वेळेस आपण असूनही नसल्यासारखे असू... आयुष्याचा खेळ कधी कलाटणी मारून जाईल सांगता येत नाही.
        तात्पर्य :- जगण्याचा अधिकार सार्यांनाच असतो, प्रत्येकाने प्रत्येकाचा मान ठेऊनच जगलं पाहिजे. नकळत झालेल्या कर्माची सुद्धा फळं भोगावीच लागतात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपणच ओढवलेली असते. इतरांना दोष देण्यात अर्थ नसतो.
...नित
नितेश पाटील (धनसार,पालघर)

शिक्षण आजचे...

शिक्षण आजचे...
________________________नित
          आज शिक्षण या विषयावर विश्लेशण करणारी सुज्ञ माणसं खूप आहेत.पण ती असली आणि त्यातुन बोध घेणारी सुशीक्षीत माणसं असली तरी ह्या स्पर्धेच्या जगात ही जीवनाची विस्कटलेली घडी आपण व्यवस्थीत करु शकतो ? कुठल्याही पालकांना विचारा कि...
'' किती हा मुलांचा अभ्यास, नाही ..?,
आपल्या वेळी एवढा नव्हता..!! "
"हो, खरं आहे.. पण स्पर्धेत टीकायचं असेल तर करावाच लागणार." हे उत्तर...ते चुकीचं नाहीये म्हणा...पण नेमकि शिक्षण पद्धती कशी असायला हवी यावर विचार करायला हवा. आजचं शिक्षण फक्त स्वतःसाठी आहे.
          पूर्वी शाळांची मारामार असे. शिक्षण सर्वाना सारखं मिळावं म्हणून कितीतरी समाजसुधारकाना समाजाविरुद्ध लढावं लागलं, पण आज परिस्तिथी बदललेली आहे. आज शाळेना उत आलाय. आता शाळा सुरु केल्या आहेत गुंतवणूकदारांनी. मागणी तसा पुरवठा ह्या तत्वावर. पालकांना आपल्या मुला-मुलीला रेसचा घोडा बनवायचं आहे ही मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केली. दप्तराचं आणि पालक-शिक्षकांचं अपेक्षांचं ओझं वाहणारी मुले म्हणजे चालती बोलती प्रेते बनत चालली आहेत.
       माझी भाची यंदा पाहिलीला गेली. तिची इंग्लिश माध्यमातील इयत्ता पहिलीची पुस्तकं पाहून वाटलं कि हा निरागस लहानसा जीव त्या पुस्तकांचे ओझे कसे सांभाळणार... त्यातील इंग्लिशमधील वाक्यरचना... ती आकडेमोड... सारं त्या जीवा पलीकडचं... तरीही तिला ते ओझं उचलावच लागणार... सकाळी उठून शाळा... शाळेतून आली कि क्लास....क्लास वरून आली कि दोन्हींचे गृहपाठ...झाला भरला दिवस... हा नित्यक्रम चालूच राहणार... आणि दिवसभराच्या शैक्षणिक ज्ञान मिळवण्यासाठी त्या चिमुरडीचे उध्वस्थ झालेले बाळपण...परिणामी होणारी आईवडिलांचीही दगदग...त्या सर्वांचे रुपये आपण शैक्षणिक स्वंस्थाना भरायचे...किती ते सार्यांना माहित आहेच...स्वस्थेचं नाव तसा रुपया...
        भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षण तज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरु झाला. मोठे उद्योजग, पुढार्यांनी शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला धूळ चारली. एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या ऍडमीनेशनची तयारी सुरु होते. कृष्णाला जन्मण्याआधी मारायची तयारी मामाने केली होती. आता मुल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा घोडा बनवायची तयारी सुरु होते.
      आज समाज्यात जे आयकॉन आहेत त्यांचं ते अनुकरण अचूक करतील. पण स्वताची ओळख निर्माण करणार नाहीत. कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं. जगायची कला, गीत-संगीतातील आनंद, निसर्गसंपदेची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार, साहित्य ह्याला बाजारू किंमत नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळतंय, त्यात ते पारंगत होत आहेत. बहुतांशी मुलांना जास्त पगाराच्या नोकऱ्याही मिळतात पण त्यात देशाचं नाही, भांडवलदारांच हित साधलं जातंय. पुढची पिढी मोठी पदवी मिळवेल पण न स्वत जगण्याचा आनंद लुटू शकतील, न दुसर्याला जगण्याची मजा मिळू देतील. आज देश जिथे सुशिक्षित आहे तिथे भ्रष्टाचार आहेच, अनैतिकता, वृद्धाश्रम...काय कमी आहे. काहीच नाही..!! नेमका समाज सुशिक्षित कसा होतो ते काही मला कळलेलं नाही. असो माझंही अज्ञान असेल...
       इतर देशातील शिक्षण धोरणांवर एक लेख माझ्या वाचनात आला होता,  कुठे आठवत नाही पण काही मुद्दे आठवतात. खरं खोट्यापेक्षा मुद्दे महत्वाचे आहेत. सुशिक्षित अज्ञानाचा धोका ओळखून जपानमध्ये मुलांना घोकंपट्टी पेक्षा प्रॅक्टिकलवर भर देतात. वृक्ष-वेली स्वताच अन्न स्वत तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात?...असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर भाजी लावायला शिकवतात. त्या रोपांची-वेलींची जोपासना करायला लावतात. जर्मनी मुलांना परदर्शकतेच शिक्षण देते. तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेवून दुसरी पर्यंत लेखन करू देत नाहीत. पाचवीपर्यंत प्रॅक्टिकल चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई सेविका, प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल ह्याची सतत तपासणी होते. दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्रांच प्रशिक्षण देतात. सगळे एकदम सायन्स मध्ये भरत नाहीत. अनावश्यक विषय शिकवत नाहीत. चीन हा सायकल प्रेमी देश. ४ वर्षाच्या मुलांना सायकल चालवण्याच शिक्षण देतो. त्यानंतर थेरी कमी आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात. प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालवणार हाच विचार ते देश करतात. एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत. चारी दिशांनी अनेक विषय आणि क्लासचा मारा सोसण्याच काम भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते.
      रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात पहा.
टागोरांची "शांतीनिकेतन" शाळा झाडांखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई. एकदा टागोर झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्या समोर पुस्तकात डोक खुपसून बसली होती. आणि उरलेली बरीच मुले खेळत-बागडत होती.  कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सुगंध घेत फिरत होता. तेवड्यात एक पालक तिथे आले. पाहतात तर काय...गुरुदेव शांतपणे बसले होते आणि फक्त चार मुले पुस्तकात डोके खुपसून बसली होती व इतर मुले हसण्यात-नाचण्यात रमली होती. सुटा-बुटातील पालक महाशय टागोरांना म्हणाले- “या नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का?”
टागोर म्हणाले- “चिंता वाटते, पण नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांची नाही तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या मुलांची. ही मुले खेळण्या-बागडण्याच्या वयात मोठ्या माणसासारखी वागत आहेत. ही मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत. प्रौढ तर मीसुद्धा अजून झालो नाही. खरं तर मलाही झाडावर चढाव असं वाटतं. पक्ष्यांशी बोलावसं वाटत. भरपूर खेळावस वाटतं. पण माझ शरीर आता साथ देत नाही. “
      रवींद्रनाथ टागोर जगण्यासाठी शिकवत होते. आता शिकण्यासाठी जगावे लागते. जास्त ज्ञान, जास्त कला घेवून मुले धावत असतात.
आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात ! मग एक रेस सुरु होते आणि जगायचं राहून जातं !!
पण ईतर देशातील शिक्षण पद्धती भारतात का वापरली जात नाही ? त्या देशातील ( पेहराव ,भाषा,संस्कृती, model,smart city,bulet train,ईतर ) अनावश्यक म्हणता नाही येणार..!! पण शिक्षण पद्धती का नाही ?

अज्ञान मी
ज्ञानी जग सारे
शिशु वयात थोरपण
बालपण हरवले का रे
...नित
नितेश पाटील (धनसार,पालघर)

Sunday, May 29, 2016

अद्वैत...

*●●अद्वैत●●*
________________________नित
      द्वैत म्हणजे अज्ञान, रूढी, भेदभाव ,दारिद्र्य दुबळेपणा, भ्याडपणा. आणि समाज अजूनही त्याच्या अधीन आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. पण ह्या द्वैतातून अजून समाज का बाहेर आला नाही. आज माणूस चंद्रा, मंगळावर गेला तरी हे द्वैत का नाहीसा करू शकला नाही. साहित्यातील सर्वात जुने विश्वात प्रथम स्थानी असणाऱ्या वेदांपासून ते आजपर्यंतच्या तमाम अद्वैत पुरस्कृत साहित्याचा, साधनांचा मानवी जीवनावर तितकासा अद्वैतरुपी प्रभाव का पडू शकला नाही. मान्य मतभिन्नता असते पण ती जतन करत असताना समाजाचा विचार न करता स्वतःचा विचार, म्हणजेच स्वतःला जे पटेल तेच मांडण्याचा आणि विशेष म्हणजे रुजवण्याचा प्रयत्न केला असावा का. हे आणि असे बरेच प्रश्न मला आज पाडतायेत. याला कारणीभूत अज्ञान आहे हे मी जाणतो. पण अज्ञान हे महत्वाचं कारण असलं तरी सुशिक्षित अज्ञान या परिस्तिथीस (द्वैत) जास्त कारणीभूत आहे असं मला वाटतं.
          अद्वैताची परिभाषा सोपी आहे. आपणास येणाऱ्या सुखदुःखाच्या अनुभवावरून दुसऱ्याच्या सुखदुःखाची कल्पना येणे. म्हणजे एक प्रकारे अद्वैत. जे विरळ झालंय...
अद्वैत म्हणजे अमूर्त कल्पना नव्हे, अद्वैत म्हणजे प्रत्यक्ष व्यवहार. जो आज अप्रत्यक्ष रीतीने केला जातो... मोठ्या प्रमाणात....
अद्वैत म्हणजे चर्चा नव्हे अद्वैत म्हणजे अनुभूती.... आज बहुतांशी चर्चेचीच गुऱ्हाळं चालतात. अनुभूती फक्त स्वतःसाठी.....समाजासाठी नाही....
कुणीही दुःखी असू नये, कुणीही भुकेला असू नये.  असे म्हणणारे सारेच आहेत पण त्यासाठी झटणारे आणि आपापल्या परीने प्रत्यक्ष त्या परिस्तिशी एकरूप होऊन कार्य करणारे कितीसे आहेत....हाही प्रश्न आहेच
          या सृष्टीचं आपण निरक्षण करा. मेघ सारे पाणी देऊन टाकतात. त्यांनी थांबा घ्यावा अशी ठिकाणं माणसांनीच नाहीशी करून टाकलीत तो भाग वेगळा... झाडे, फुल त्यांचा गंध, फळे देऊन टाकतात. पण आम्हाला त्याचं सोयर सुतक नाही आम्ही त्यांना कापण्यात पटाईत झालोत, आम्हाला काँक्रेटिकरण जे करायचं आहे....नद्या ओलावा देतात, सूर्य आपले तेज, चंद्र आपली शीतलता, आकाशातील सारे तारे सर्वांसाठी आहेत, हि हवा सर्वांसाठी आहे आज माणसाला काय कमी आहे सृष्टीने किती फुकट दिलंय. पण मला माझं पाहिलं पाहिजे... हि जमीन सर्वांसाठी होती पण माणसाने तिचा तुकडा अलग केला आणि माझी म्हणू लागला... हरकत नाही हो... जो तो आपापल्या परीने जगत असतो... पण मानासमांसात तेढ निर्माण करणं, जाती-धर्माच्या नावाखाली अज्ञान पसरवणे हे चुकीचं आहे. हे सुशिक्षित अज्ञान पिटाळून लावलं पाहिजे.
*अद्वैत...*
गंध फुले देऊन जाती
मेघ सारे पाणी
मीच माझे जपत राहिलो
नसताना काही

वेद, पुराणे, साहित्य
गाती अद्वैताचे गोडवे
सज्ञान असतील वाचक
जड द्वैताचे पारडे

तूच जाणावें अद्वैत
लेका शिकवावे
नाही येणे कुणाचे
आता वसुंधरेवरी...
*...नित*
     आणि अद्वैत म्हणजे मरण हि आहे. स्वतः मेल्याशिवाय परमेश्वराचे दर्शन होत नाही. खरे खोटे मला माहित नाही पण साधू संतांची वाणी आहे. बरं स्वतः मरणे  म्हणजे प्रत्यक्षात मरणे नाही....स्वतःचा अहंकार कमी करणे, स्वतःची पूजा कमी करणे. जे आहे सर्वांसमवेत जगणे. गौतम बुद्धांनी स्वतःला मालवून टाकले तेव्हा त्यांना सर्व चराचराला प्रेम देता आले. अद्वैताचा उच्चार म्हणजे स्वतःच्या स्वार्थी सुखावर निखारा ठेवणे आणि शक्य होत नसेल तर उगाच भूलथापा मारू नये.
तुकाराम महाराजांची ओवी आहे
तुका म्हणे व्हावी प्राणांसवें तुटी ।
नाहीतर गोष्टी बोलू नये ।।
       या भारत वर्षात आजपर्यंत सतत अद्वैताचा डंका वाजत आला पण आजही बहुतांशी समाज असा आहे जिथे कुणी ढुंकूनही बघत नाही. आज अब्जावधी वर्षापासून साधू ,संत, ऋषिमुनींनी अद्वैताची शिकवण दिली ती व्यर्थच आहे आणि म्हणूनच आज भारतात जाती धर्मांच्या भिंती अधिकच बळकट झाल्या आहेत.
जाळीन मी भेद। येथे प्रमाण तो वेद
अशी तुकाराम महाराजांनी प्रतिज्ञा केली आहे.
साने गुरुजींनीही म्हंटल आहे
भाकरीचा तुकडा ओठात ठेऊन जमणार नाही तो पोटात जायला हवा तरच शरीर सुदृढ व सतेज होईल. थोर वचने कृतीत उतरतील तेव्हाच समाज सुखी व आरोग्यसंप्पन होईल. हल्ली दिखाऊ वृत्तीला उत आलाय. आणि जो तो शर्यतीत गुरफटलाय.
           हे खरं आहे कि आता संत होणे नाही. पण माणसाने एक लक्षात घेतलं पाहिजे, या जगाचं भलं व्हावं असं कुणाला वाटत असेल तर ते आई वडील, संत आणि भगवंत.... आता या घोर कलयुगात संत आणि भगवंत अवतरणे म्हणजे सोपं काम नाही. पण आईवडील या पृथ्वीवर होते, आहेत आणि असतीलही. प्रत्येक आईवडिलांनी अद्वैत जाणून ते आपल्या मुलांना आचरणात आणायला शिकवलं पाहिजे. फक्त शर्यतीत भाग घेणं आणि जिंकणं म्हणजे आयुष्य नाही. समाजात द्वैत फोफावत असेल तर त्याचे चटके उशिरा का होईना पण सर्वानाच बसतील.
अद्वैत कल्पना प्रकाशे । तेचि क्षणी द्वैत नासे । द्वैता सरिसी निरसे। सबळ कल्पना । । ७ -५ -३७ । ।
...दासबोध
अद्वैत कल्पना जेव्हा उगम पावते त्या क्षणी द्वैत नाहिसे होते .त्याच वेळेस सबळ कल्पना म्हणजे अशुध्द कल्पना नाहिशा होतात .
*प्रेरणेतून....*
*...नितेशपाटील(धनसार,पालघर)*