.................................................नितेश पाटील
प्रार्थनेतून एकाच ठायी नित्य
सुखदुःख येती जे माझीया कर्मे
तैसे निरंतर बळ मज देत राही....
माणूस म्हंटला कि सुख-दुःखे आलीच. त्याशिवाय त्याच जीवनच नाही.पण माणूस त्याच्या अधीन जास्त जात असल्यामुळे, आणि नात्यांच्या बंधनात वाहवत जात असल्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या जगण्यावर होत असतो. पण एक लक्षात घेतलं तर कळेल कि सुखात सारेच सहभागी असतात. पण दुःखात मात्र मोजकेच असतात. म्हणजेच गंध हवा असतो..!! पण आवडीचा असेल तर... अशी गत असते...
तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदु:खे आहेत ती ऋतूप्रमाणे आहेत. ती सुख-दु:खे आपल्या इंद्रियांना होणाऱ्या जाणिवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती खवळून, चवताळून, अती उत्साहित न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. म्हणजेच मर्यादेत राहिलं पाहिजे. ज्याने मर्यादा पाळली त्याचा समाजात सन्मान होत असतो हा इतिहास आहे.
विश्व म्हणजे काय..?? ते कोणी निर्मीले..?? या प्रश्नांची उत्तर निःसंशय भिन्न आढळतील. याचाच अर्थ माणसांचे विचार भिन्न असतात. आणि त्यामुळेच सुखदुःखाची परिभाषाही वेगवेगळी असते. त्यानुसारच माणूस झगडत असतो. स्वतःजवळ असलेल्या, मिळवलेल्या ज्ञानाने स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो.
काही वेळेस त्याला आपल्या तत्वानुसार मित्र, नातेवाईक किंव्हा इतर कुणाशीही झगडावे लागले तरी त्याने त्याच्या नियतकर्मापासून ढळू नये. शेवटी हे विश्व मायाजाल आहे. ज्ञान एका विशिष्ट स्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी एखाद्याने नियत विधीविधानांचे पालन करणे आवश्यक आहे. काही झालं तरी प्रत्येकाला बंधनं हि असतातच. त्याचे प्रकार वेगवेगळे असतील तो भाग वेगळा.
मनासारखे कुणालाच जगता येत नसते. परिस्तिथीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजेच अध्यात्म. ईश्वर कुठे असेल तर तो आपल्या भक्तीने, प्रार्थनेने, आचरणाने एका जागी आपणच स्तिथ केलेला असतो. आता ते आचरण ती भक्ती आणि प्रार्थना कोणी कुठे कशाप्रकारे साठवलंय अथवा नाही हे ज्याचं त्याला अवगत असतं. तो त्या जागी पोहचल्यावर निश्चितच तुम्हाला संघर्ष करण्याचं बळ ती देत असते. तसेच समस्या नष्ट करणारे ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान. म्हणूनच केवळ ज्ञान व भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या तावडीतून स्वत:ला मुक्त करू शकतो ....
.......नितेश पाटील
९६३७१३८०३१