*●●अद्वैत●●*
________________________नित
द्वैत म्हणजे अज्ञान, रूढी, भेदभाव ,दारिद्र्य दुबळेपणा, भ्याडपणा. आणि समाज अजूनही त्याच्या अधीन आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. पण ह्या द्वैतातून अजून समाज का बाहेर आला नाही. आज माणूस चंद्रा, मंगळावर गेला तरी हे द्वैत का नाहीसा करू शकला नाही. साहित्यातील सर्वात जुने विश्वात प्रथम स्थानी असणाऱ्या वेदांपासून ते आजपर्यंतच्या तमाम अद्वैत पुरस्कृत साहित्याचा, साधनांचा मानवी जीवनावर तितकासा अद्वैतरुपी प्रभाव का पडू शकला नाही. मान्य मतभिन्नता असते पण ती जतन करत असताना समाजाचा विचार न करता स्वतःचा विचार, म्हणजेच स्वतःला जे पटेल तेच मांडण्याचा आणि विशेष म्हणजे रुजवण्याचा प्रयत्न केला असावा का. हे आणि असे बरेच प्रश्न मला आज पाडतायेत. याला कारणीभूत अज्ञान आहे हे मी जाणतो. पण अज्ञान हे महत्वाचं कारण असलं तरी सुशिक्षित अज्ञान या परिस्तिथीस (द्वैत) जास्त कारणीभूत आहे असं मला वाटतं.
अद्वैताची परिभाषा सोपी आहे. आपणास येणाऱ्या सुखदुःखाच्या अनुभवावरून दुसऱ्याच्या सुखदुःखाची कल्पना येणे. म्हणजे एक प्रकारे अद्वैत. जे विरळ झालंय...
अद्वैत म्हणजे अमूर्त कल्पना नव्हे, अद्वैत म्हणजे प्रत्यक्ष व्यवहार. जो आज अप्रत्यक्ष रीतीने केला जातो... मोठ्या प्रमाणात....
अद्वैत म्हणजे चर्चा नव्हे अद्वैत म्हणजे अनुभूती.... आज बहुतांशी चर्चेचीच गुऱ्हाळं चालतात. अनुभूती फक्त स्वतःसाठी.....समाजासाठी नाही....
कुणीही दुःखी असू नये, कुणीही भुकेला असू नये. असे म्हणणारे सारेच आहेत पण त्यासाठी झटणारे आणि आपापल्या परीने प्रत्यक्ष त्या परिस्तिशी एकरूप होऊन कार्य करणारे कितीसे आहेत....हाही प्रश्न आहेच
या सृष्टीचं आपण निरक्षण करा. मेघ सारे पाणी देऊन टाकतात. त्यांनी थांबा घ्यावा अशी ठिकाणं माणसांनीच नाहीशी करून टाकलीत तो भाग वेगळा... झाडे, फुल त्यांचा गंध, फळे देऊन टाकतात. पण आम्हाला त्याचं सोयर सुतक नाही आम्ही त्यांना कापण्यात पटाईत झालोत, आम्हाला काँक्रेटिकरण जे करायचं आहे....नद्या ओलावा देतात, सूर्य आपले तेज, चंद्र आपली शीतलता, आकाशातील सारे तारे सर्वांसाठी आहेत, हि हवा सर्वांसाठी आहे आज माणसाला काय कमी आहे सृष्टीने किती फुकट दिलंय. पण मला माझं पाहिलं पाहिजे... हि जमीन सर्वांसाठी होती पण माणसाने तिचा तुकडा अलग केला आणि माझी म्हणू लागला... हरकत नाही हो... जो तो आपापल्या परीने जगत असतो... पण मानासमांसात तेढ निर्माण करणं, जाती-धर्माच्या नावाखाली अज्ञान पसरवणे हे चुकीचं आहे. हे सुशिक्षित अज्ञान पिटाळून लावलं पाहिजे.
*अद्वैत...*
गंध फुले देऊन जाती
मेघ सारे पाणी
मीच माझे जपत राहिलो
नसताना काही
वेद, पुराणे, साहित्य
गाती अद्वैताचे गोडवे
सज्ञान असतील वाचक
जड द्वैताचे पारडे
तूच जाणावें अद्वैत
लेका शिकवावे
नाही येणे कुणाचे
आता वसुंधरेवरी...
*...नित*
आणि अद्वैत म्हणजे मरण हि आहे. स्वतः मेल्याशिवाय परमेश्वराचे दर्शन होत नाही. खरे खोटे मला माहित नाही पण साधू संतांची वाणी आहे. बरं स्वतः मरणे म्हणजे प्रत्यक्षात मरणे नाही....स्वतःचा अहंकार कमी करणे, स्वतःची पूजा कमी करणे. जे आहे सर्वांसमवेत जगणे. गौतम बुद्धांनी स्वतःला मालवून टाकले तेव्हा त्यांना सर्व चराचराला प्रेम देता आले. अद्वैताचा उच्चार म्हणजे स्वतःच्या स्वार्थी सुखावर निखारा ठेवणे आणि शक्य होत नसेल तर उगाच भूलथापा मारू नये.
तुकाराम महाराजांची ओवी आहे
तुका म्हणे व्हावी प्राणांसवें तुटी ।
नाहीतर गोष्टी बोलू नये ।।
या भारत वर्षात आजपर्यंत सतत अद्वैताचा डंका वाजत आला पण आजही बहुतांशी समाज असा आहे जिथे कुणी ढुंकूनही बघत नाही. आज अब्जावधी वर्षापासून साधू ,संत, ऋषिमुनींनी अद्वैताची शिकवण दिली ती व्यर्थच आहे आणि म्हणूनच आज भारतात जाती धर्मांच्या भिंती अधिकच बळकट झाल्या आहेत.
जाळीन मी भेद। येथे प्रमाण तो वेद
अशी तुकाराम महाराजांनी प्रतिज्ञा केली आहे.
साने गुरुजींनीही म्हंटल आहे
भाकरीचा तुकडा ओठात ठेऊन जमणार नाही तो पोटात जायला हवा तरच शरीर सुदृढ व सतेज होईल. थोर वचने कृतीत उतरतील तेव्हाच समाज सुखी व आरोग्यसंप्पन होईल. हल्ली दिखाऊ वृत्तीला उत आलाय. आणि जो तो शर्यतीत गुरफटलाय.
हे खरं आहे कि आता संत होणे नाही. पण माणसाने एक लक्षात घेतलं पाहिजे, या जगाचं भलं व्हावं असं कुणाला वाटत असेल तर ते आई वडील, संत आणि भगवंत.... आता या घोर कलयुगात संत आणि भगवंत अवतरणे म्हणजे सोपं काम नाही. पण आईवडील या पृथ्वीवर होते, आहेत आणि असतीलही. प्रत्येक आईवडिलांनी अद्वैत जाणून ते आपल्या मुलांना आचरणात आणायला शिकवलं पाहिजे. फक्त शर्यतीत भाग घेणं आणि जिंकणं म्हणजे आयुष्य नाही. समाजात द्वैत फोफावत असेल तर त्याचे चटके उशिरा का होईना पण सर्वानाच बसतील.
अद्वैत कल्पना प्रकाशे । तेचि क्षणी द्वैत नासे । द्वैता सरिसी निरसे। सबळ कल्पना । । ७ -५ -३७ । ।
...दासबोध
अद्वैत कल्पना जेव्हा उगम पावते त्या क्षणी द्वैत नाहिसे होते .त्याच वेळेस सबळ कल्पना म्हणजे अशुध्द कल्पना नाहिशा होतात .
*प्रेरणेतून....*
*...नितेशपाटील(धनसार,पालघर)*